







आतापर्यंत केवळ ३६.४४ टक्के प्रक्रिया पूर्ण; अन्नमंत्र्यांचे सर्व्हर समस्या सोडविण्याचे आदेश
बेळगाव : रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता अवघे १५ दिवस शिल्लक राहिले असून, मुदत संपत आल्याने रेशन कार्डधारकांची चिंता वाढली आहे. त्यातच सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी अभियानाला संथ प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत केवळ ३६.४४ टक्के ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेशन कार्डधारकांनी मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी न झाल्यास भविष्यात रेशनच्या लाभावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांकडून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन, तांत्रिक अडथळे आणि प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणारा वेळ यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ई-केवायसीची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी असल्याची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री रिजवान हर्षद यांनी सर्व्हरमधील समस्या तातडीने दूर करण्याचे आदेश दिले आहेत. रेशन वितरण ही नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा असल्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, रेशन कार्डधारकांना स्वतःच्या मोबाईलवरूनच ई-केवायसी करता यावी, यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रेशन दुकान किंवा संबंधित केंद्रांवर वारंवार जाण्याची गरज कमी होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
मुदत संपण्यास केवळ १५ दिवस उरले असताना ई-केवायसीची प्रगती अद्याप ५० टक्क्यांपर्यंतही पोहोचलेली नाही. त्यामुळे सर्व्हरची अडचण तातडीने दूर करून प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे मोठे आव्हान अन्न व नागरी पुरवठा विभागासमोर आहे.

Belgaum Varta Belgaum Varta