Monday , April 20 2026
Breaking News

माणूस हाच मराठी-कन्नड साहित्याचा केंद्रबिंदू : डॉ. श्रीपाल सबनीस

Spread the love

बेळगाव : माणूस आणि त्याचे जगणे हाच मराठी आणि कानडी साहित्याचा केंद्रबिंदू आहे. दोन्ही साहित्यात भाषा बांधावयाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे, असे विचार प्रख्यात मराठी साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले.
बेळगावातील मराठा मंदिरमध्ये रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिरतर्फे आयोजित अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कर्नाटक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, बेळगाव जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, मराठी-कानडी भाषिकात आणि साहित्यातही पूर्वापार काळापासून भाषाबांधव्य चालत आले आहे. दोन्ही साहित्यांचा केंद्रबिंदू माणूस आणि त्याचे जगणे हाच आहे. कन्नड साहित्यात शरण साहित्यापासून ते शिवराम कारंथ, एस. एल. भैरप्पा पर्यंत आणि मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आदींच्या संत साहित्यात आणि अगदी आजच्या साहित्यात देखील माणूस हाच केंद्रस्थानी राहिला आहे. साहित्यिक सत्याची, गुणांची पूजा करतात. माणसातील माणूसपण टिकवून ठेवतात असे विचार डॉ. सबनीस यांनी मांडले. येसोजीराजांना राणी चन्नम्मा यांनी केलेल्या मदतीचा संदर्भ असो किंवा अन्य काही प्रसंग, असो हा इतिहासाचा अनुबंध आहे. भाषेचे शत्रू कोण व का होत आहेत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भाषक बंधुत्वाची परंपरा टिकवून ठेवली पाहिजे असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.

उद्योजक अप्पासाहेब गुरव यांनी संमेलनाचे उदघाटन केले. यावेळी साहित्यिक शरद गोरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वकील सुधीर चव्हाण, उद्योजक महादेव चौगुले, मराठा बँकेचे दिगंबर पवार, शहर देवस्थान पंच रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद गोरे यांनी प्रत्येक जण वैश्विक व्हायला हवं जगातील सगळ्या भाषा याव्यात. सगळ्यांचा वैश्विक हा धर्म असला पाहिजे आजच्या घडीला धर्मासाठी राजकीय कार्यक्रम होत असल्याची टीका केली.

संमेलनाला बेळगाव शहर, परिसर, तालुका व सीमाभागातून मराठी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *