Friday , May 16 2025
Breaking News

बळ्ळारी नाला अडकला आश्वासनाच्या गर्तेत!

Spread the love

 

बेळगाव : बहुचर्चित असा बळ्ळारी नाला वडगाव, शहापूर परिसरातील शेतकऱ्यांना शापच ठरला आहे. वारंवार मागणी करून देखील बळ्ळारी नाल्याची सफाई करण्याकडे प्रशासनाचे जाणून-बुजून दुर्लक्ष होत आहे. प्रत्येकवेळी नव्याने आलेले सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतात मात्र बळ्ळारी नाल्यासंदर्भात आखण्यात आलेली योजना ही नेहमी कागदावरच राहते. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील शेतकऱ्यांनी, विविध शेतकरी संघटनांनी सरकार दरबारी अनेक निवेदने दिली, आंदोलने केली. मात्र त्यांच्या निवेदनाला व आंदोलनाला प्रशासनाने नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी समाज माध्यमातून किंवा वृत्तपत्रातून बळ्ळारी नाल्यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर लोकप्रतिनिधी काहीसे जागे होतात, नाल्याची पाहणी करतात आणि शेतकऱ्यांना आश्वासन देतात. भोळेभाबडे शेतकरी या आश्वासनावर समाधान मानतात पण पावसाळा जवळ येताच प्रत्यक्षात कृती शून्यच असते व परत या भागातील शेतकरी हवालदिल होतो. दरवर्षी या परिसरातील शेतकरी कष्टाने खर्च करून प्रसंगी कर्ज काढून शेताची मशागत करतो आणि खरीप पेरणी करतो. मात्र थोडा जरी पाऊस पडला की बळ्ळारी नाला परिसरात पूरसदृश परिस्थिती बनते कारण नाल्यात बऱ्याच वर्षापासून गाळ, जलपर्णी साचली आहे. या जलपर्णीमुळे पिकाऊ जमिनीची पातळी खाली झाली असल्यामुळे थोड्याशा पावसाने देखील शेतात पाणी शिरते. त्यामुळे खरीप पिक आणि मुळका एक झाल्याने सर्व पिके कुजून जातात त्यानंतर शेतकऱ्याला परत पेरणी किंवा रोप लागवड करावी लागते त्यानंतर देखील पीक हाती लागेल याची शाश्वती शेतकऱ्याला नसते. सरकारची मदत म्हणजे धन्यास कन्या आणि चोरास मलिदा असा प्रकार होतो. सरकारने दिलेला मोबदला पाहता प्रत्यक्षात शेतकऱ्याने केलेला खर्च हा जास्त होतो त्यामुळे शेतकऱ्यांना या भागात शेती करणे परवडेनासे झाले आहे. तरी देखील शेतकरी आशावादी होऊन आपल्या शेतात कष्ट करत असतो. तशीच परिस्थिती काहीशी रब्बी पिकांची देखील होते. मागील भाजप सरकारमधील जिल्हा पालकमंत्र्यांनी बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला जाईल असे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात ते आश्वासनच राहिले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी येळ्ळूर ते पुणे बेंगलोर बळ्ळारी नाल्यातील गाळ जलपर्णी मंत्री महोदया लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकाराने काढण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला व खरीप रब्बी पिके थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाली. त्यानंतर संपूर्ण बळ्ळारी नाला नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी दक्षिणच्या आमदारांनी नाला खुदाईसाठी आश्वासन दिले होते तसेच पालकमंत्र्यांनी देखील प्रत्यक्ष पाहणी करून आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुश होऊन पालकमंत्र्यांचा यथोचित सत्कार देखील त्यावेळी केला होता. पण पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे तरी देखील बळ्ळारी नाला खुदाईसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यातच हवामान खात्याने यावर्षी सरासरी 105 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे खरोखर सरासरीपेक्षा 105 टक्के पाऊस झाल्यास पुन्हा 2019 ची परिस्थिती येईल का? याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यातच पुढचा बेकायदेशीर बायपास रस्ता शेतकऱ्यांना त्यापेक्षाही महाभयंकर ठरणार आहे जर महापूर आलाच तर शहापूर, वडगाव, बेळगाव, येळ्ळूर, मच्छे, धामणे, हलगा, मजगाव, अनगोळसह या भागातील संपूर्ण शिवार जलमय झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या भागातीलच नव्हे तर संपूर्ण बळ्ळारी नाला परिसरातील शेतकरी संकटात येणार आहे. त्यासाठी कर्नाटक सरकार तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येणाऱ्या पावसाळ्याची गांभीर्य राखून तात्काळ बळ्ळारी नाला खुदाईस प्रारंभ करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा “बळ्ळारी नाला आश्वासनात अडकला त्यात शेतकरी मेला” अशी परिस्थिती या भागातील शेतकऱ्यांची होईल की काय अशी भीती शेतकरी व नागरिकात पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

खोटी बातमी पसरवणाऱ्या अनिस उद्दीन विरोधात गुन्हा दाखल

Spread the love  पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची माहिती बेळगाव : कर्नल सोफिया कुरेशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *