Monday , April 20 2026
Breaking News

तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद केल्याने नागरिकांचा संताप : आंदोलनानंतर अखेर गेट सुरु

Spread the love

 

बेळगाव : तानाजी गल्ली बेळगाव येथील रेल्वे गेट तत्काळ खुला करण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी सोमवारी दुपारी निदर्शने करत रेल रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिकांची तक्रार ऐकून रेल्वे प्रशासनाला बंद केलेला मार्ग पुन्हा खुला करावा लागला.

तानाजी गल्ली रेल्वे गेट परिसरात यापूर्वीच वाहनांना बंदी घालण्यात आली होती. मात्र आज पादचारी मार्ग देखील बंद केल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत चक्क रेल्वे रुळावरच ठिय्या आंदोलन केले. रेल्वे विभागाने यापूर्वीच तानाजी गल्ली रेल्वे फाटकावर भिंत बांधून वाहनांना संचारबंदी केली होती. त्याचा येथील व्यवसायिकांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. पादचारांसाठी काहीसा मार्ग खुला ठेवण्यात आला होता मात्र रेल्वे प्रशासनाने आज तो देखील बंद केल्याने स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करण्यास अडथळा होऊ लागला. यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलन छेडले व रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. विशेषतः फोर्ट रोड ते महाद्वार रोड या भागात ये- जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत होता. एकीकडे वाहन चालकांना या रस्त्यावरून बंदी घालण्यात आली होती तर दुसरीकडे पादचाऱ्यांची गैरसोय झाल्याने रेल्वे प्रशासनाला स्थानिक नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. सदर मार्ग बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने या आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला व नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या मार्गात भिंत घातल्यामुळे महिला व विद्यार्थी वर्गाला ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. या भागातील नागरिकांना लांबचा पल्ला पार करावा लागत आहे. याचा फटका शाळकरी मुलांना होत आहे. रिक्षावाल्यांकडून जास्त भाडे वसुली होत असल्याची तक्रार देखील यावेळी नागरिकांनी केली. या आंदोलनाची माहिती मिळतात श्रीराम सेना हिंदुस्तानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांनी देखील स्थानिक नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. पोलिस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. या चर्चेअंती प्रशासनाला बंद केलेला मार्ग पुन्हा खुला करावा लागला. तानाजी गल्ली रेल्वे गेट संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून यावेळी देण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *