Saturday , July 27 2024
Breaking News

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा

Spread the love

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विविध राजकीय पक्ष संघटना, संस्था सामाजिक संघटना, यांच्यासह कोल्हापूरकरांचा शनिवारी झालेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंच‘ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने आरपार की लढाईचे रणशिंग फुंकले होते.
शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत धरणे आंदोलनात कोल्हापूरातील विविध मराठा संघटना, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, दलित महासंघ, मुख्याध्यापक संघ, माजी महापौर संघटना, मुस्लिम बोर्डिंग पदाधिकारी, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, माजी नगरसेवक संघटना, कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यासह विविध पक्ष- संघटनांनी प्रचंड पाठिंबा देऊन आम्ही सीमावासीयांच्या पाठीशी आहे हे सिद्ध केले. नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पवार, भाजपचे महानगराध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, अशोक देसाई, संदीप देसाई, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, माजी महापौर सुनील कदम, माजी गटनेते सत्यजित उर्फ नाना कदम, माजी विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, मावळाचे उमेश पवार, विनोद साळुंखे यांच्यासह डाव्या पक्षांचे सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला व सीमावासीयांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, चिटणीस आबासाहेब दळवी, प्रतापराव सरदेसाई, प्रकाश चव्हाण, विशाल पाटील, रमेश देसाई, मनोज पावशे, शामराव पाटील, मुरलीधर पाटील, नारायण कापोळकर, महेश प्रभू, महादेव घाडी, रवी पाटील, मरू पाटील या धरणे आंदोलनामध्ये सीमालढाच्या पहिल्या आंदोलनात सहभागी झालेले ज्येष्ठ कार्यकर्ते सीमासत्याग्रही नारायण लाड, शंकर मामा पाटील, नारायण पाटील, देव उर्फ देवाप्पा घाडी गुरुजी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
समारोप प्रसंगी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी कोल्हापूरवासियांचे आभार मानले. त्याचबरोबर 1993च्या शरद पवार यांनी सुचवलेल्या तोडग्यानुसार सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा अशी कळकळीची विनंती व आवाहन केले.
आंदोलनातील महत्त्वाचा ठराव ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 1993 मध्ये सुचवलेल्या तोडग्यानुसार सीमाप्रश्न सुटावा यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार, आमदार यांची एक बैठक दिवाळीनंतर आयोजित करावी त्याद्वारे कृती समितीची नियुक्ती करून राज्य व केंद्रस्तरावर पाठपुरावा करावा अशा पद्धतीचा ठराव या आजच्या धरणे आंदोलनात केल्याची माहिती विवेक गिरी यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हा पालकमंत्र्यांनी केली खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Spread the love  मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जनतेच्या तक्रारी स्वीकारून समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *