बेळगाव : ’ऑपरेशन मदत’च्या पुढाकाराने ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार व पालकांमध्ये जागृती.
’ऑपरेशन मदत’ च्या पुढाकाराने ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम शाळेंच्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यापैकी गोल्याळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार घेतला व तेथील पालकांची बैठक घेतली व त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. गोल्याळी गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत कित्येक वर्षांपासून शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती होत नाही., किंवा ग्रामीण भाग असल्याने येथे कोणी शिक्षक म्हणून रूजू होत नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून अतिथी शिक्षकांची वेळेवर नियुक्ती होत नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण?
सरकार खानापूर तालुक्यातील जिथे जिथे शिक्षकांची कमतरता आहे तिथे तिथे, त्या विषयांच्या अनुषंगाने शिक्षकांची लवकर नियुक्ती करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. तालुक्यातील कित्येक शाळांची डागडुजी पावसाळ्यापुर्वी होणे गरजेचे आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामीण हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्जित वैज्ञानिक लॅब, प्रोजेक्टर सहीत संगणक प्रशिक्षण विभाग, क्रिडा प्रशिक्षकांसह खेळाचे साहित्य व त्या विभागात तज्ञ शिक्षकांच्या नियुक्त्या नेमणूका कधी होणार., व अभ्यासक्रमाचे अध्ययन विद्यार्थी कधी करणार याबाबत सर्वच आलबेल आहे. सरकार प्रत्येकवर्षी बजेटमध्ये शिक्षणासाठी भलामोठा निधी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी राखीव ठेवत आहे, हे कोणीतरी लक्षात घेईल का?
खानापूर तालुक्यातील शैक्षणिक अधिकार्यांनी या विषयावर गंभीरतेने विचार केला पाहिजे. ’ऑपरेशन मदत’ च्या माध्यमातून ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत या दुर्गम भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिल, असे राहुल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
गोल्याळीच्या सरकारी उच्च प्राथमिक शाळेमध्ये 2 मराठी शिक्षक, 1 कन्नड शिक्षक व 1क्रिडा शिक्षकांची गरज आहे. या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने येथील शालेय विद्यार्थ्यांनी व पालकांनी वारंवार संबंधितांसमोर आपल्या समस्या मांडूनही काही फरक पडला नाही. त्यामुळे आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून पालकांनी थेट तालुक्याच्या शिक्षण अधिकार्यांना गाठून त्यांच्या समोर समस्या मांडल्या व निवेदने दिली.
श्री साईनाथ स्व-सहाय्य संघाच्या महिला कार्यकर्त्या, गोल्याळी गावातील विद्यार्थ्यांचे पालक व चकझड गोल्याळी, शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष रामलिंग गावस यांच्या मार्फत महिलांनी खानापूर तालुक्याचे बीईओ यांना निवेदन सादर केले. त्याचप्रमाणे गावच्या महिलांनी प्रथमच घराबाहेर पडून स्व-सहाय्य संघाच्या माध्यमातून प्रेरीत होऊन आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी खानापूच्या आमदार, तहसिलदार, सीआरपी, गोल्याळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शाळा सुधारणा कमिटी यांनाही निवेदने दिली आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे पीडिओ यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी सुजाता गुरव, सरस्वती चौगुले, संजना गुरव, पुनम चौगुले, अश्वीनी गुरव, सुवर्णा सावंत, साधना गुरव, लीला दळवी, रुपाली गुरव, सत्यभामा चौगुले, दर्शना गुरव, आरती चौगुले व कविता गुरव या सदस्या उपस्थित होत्या.
Check Also
कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन…
Spread the love आयपीएलच्या धर्तीवर नियोजन … बेळगाव : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक टीम केली …