
वादळी वाऱ्यामुळे वीज खांबांचे मोठे नुकसान; ५० टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण
निपाणी (वार्ता) : चार दिवसांपूर्वी बोरगाव परिसरात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे बोरगावसह परिसरातील वाडी-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळून जमीनदोस्त झाल्या असून विज वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत असून दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे.
आता दुरुस्तीचे काम ५० टक्के पूर्ण झाल्या असून लवकरच विजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती हेस्कॉम अधिकाऱ्यांनी दिली.
वादळाच्या तडाख्यामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. शेतकरी, लघुउद्योग तसेच घरगुती वापरावर याचा परिणाम जाणवत आहे. नागरिकांकडून वीजपुरवठा लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना हेस्कॉम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. उर्वरित खांब उभारणी व वाहिन्या जोडणीचे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या संदर्भात शाखा अभियंता संतना परिअर यांनी ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान काही ठिकाणी वीजपुरवठा बंद ठेवावा लागत आहे. नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. लवकरच संपूर्ण परिसरात वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांनीही प्रशासनाने कामे वेगाने पूर्ण करून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta