
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा विभागाकडून रात्री उशिरा किंवा अपरात्री पाणीपुरवठा सुरू केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिवसभर कष्ट करून थकलेल्या नागरिकांना पाणी भरण्यासाठी रात्री जागवत ठेवण्यामागील कारण काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रात्री नागरिक झोपेत असल्याने पुरवठा करण्यात येणारे पाणी गटारीला जात आहे.
रात्री पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही नागरिक नळाला पाईप जोडून तो पाण्याच्या टाकीत सोडतात आणि पाणी भरण्याची वाट पाहत बसतात. मात्र दिवसभराच्या धावपळीनंतर त्यांना झोप लागते. टाकी भरल्यानंतर पाणी ओसंडून वाहते आणि अखेर गटारीत जाते. अशा प्रकारे दररोज पाण्याची नासाडी होत असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ठरवताना नागरिकांच्या सोयीचा, त्यांच्या कामाच्या वेळेचा आणि पाण्याच्या बचतीचा विचार होणे अपेक्षित आहे. मात्र नागरिक झोपेत असताना रात्री-अपरात्री पाणी सोडण्यात येत आहे.
सध्या तलावात पाणी मुबलक दिसत असले तरी भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून प्रत्येक थेंबाचे नियोजन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पाणीपुरवठा विभागाने याबाबतजनतेला खुलासा करण्याची मागणी होत आहे.
——————————————————————–
पाणीपुरवठ्याच्या वेळा कोणत्या निकषांवर निश्चित केल्या आहेत? रात्री पाणी सोडल्यामुळे होणाऱ्या पाण्याच्या नासाडीचा विभागाने कधी आढावा घेतला आहे का? आणि नागरिकांना सोयीच्या वेळेत पाणीपुरवठा करणे शक्य नाही का?या प्रश्नांची उत्तरे पाणीपुरवठा विभागाने द्यावीत.’
-राजन चिकोडे, माजी सभापती, निपाणी

Belgaum Varta Belgaum Varta