
बेळगाव (वार्ता) : ‘गृहज्योती’ योजनेच्या लाभार्थ्यांच्या पुनर्पडताळणीसाठी राज्य सरकारने आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी निश्चित करण्यात आलेली मुदत सोमवारी संपली होती. मात्र, पुनर्पडताळणीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला.
राज्यातील विविध वीज वितरण कंपन्यांच्या कार्यक्षेत्रात अद्याप सुमारे ३० टक्के पुनर्पडताळणीचे काम बाकी असल्याने नागरिकांच्या हिताचा विचार करून ही मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने अधिकृत आदेश जारी केला आहे.
गृहज्योती योजनेचा गैरवापर रोखून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने १ जुलैपासून राज्यभर पुनर्पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अद्याप पडताळणी न झालेल्या ग्राहकांच्या कागदपत्रांची तसेच वीज जोडणीची तपासणी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मुदतवाढीमुळे अद्याप पुनर्पडताळणी न झालेल्या गृहज्योती लाभार्थ्यांना आपली कागदपत्रे आणि वीज जोडणीची पडताळणी पूर्ण करून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta