Friday , August 28 2026
Breaking News

मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा; भाजपच्या आंदोलनाला यश

Spread the love

 

बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप होत असलेल्या मंत्री बी. नागेंद्र यांनी अखेर शुक्रवारी सायंकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने विधिमंडळाच्या सभागृहात तसेच राज्यभर आंदोलन छेडले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने भाजपच्या आंदोलनाला यश मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दिल्लीहून बंगळूरला परतल्यानंतर नागेंद्र यांनी सायंकाळी विधानसौध येथे पत्रकार परिषद घेत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “मनुवाद्यांच्या कटकारस्थानामुळे मला तीन महिने तुरुंगात जावे लागले,” असा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्ष भाजपने सभागृहाचे कामकाज सुरळीत होऊ दिले नाही, असा आरोपही नागेंद्र यांनी केला. “भाजपने सभागृहाचे कामकाज बिघडवले. संविधानविरोधी शक्ती आजही मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा वेदकाल किंवा पुराणकाल नाही. हा संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काळ आहे,” असे ते म्हणाले.

उत्तरकांडातील शंबूक हत्येचा संदर्भ देत नागेंद्र यांनी संविधानामुळे आज वंचित घटकांना संरक्षण मिळत असल्याचे सांगितले. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना समान हक्क मिळू नयेत, अशी मनुवादी मानसिकता असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला.

वाल्मिकी विकास महामंडळातील निधी गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे नागेंद्र यांच्यावर राजीनाम्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने या प्रकरणाला आता राजकीयदृष्ट्या नवे वळण मिळाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा क्लबमध्ये सुळसुळाट!

Spread the love  बेंगळूरमधील १० क्लबवर अन्नसुरक्षा विभागाची धडक कारवाई; अस्वच्छ स्वयंपाकघरे, धुरळ्याचा वावर उघड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *