
बेळगाव : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कर्नाटकात कृत्रिम पनीर अर्थात ‘अनालॉग पनीर’च्या वापरावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. राज्य अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर खाद्यसंस्थांमध्ये कमी खर्चात पनीर तयार करून अधिक नफा मिळवण्यासाठी दुधाऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च तसेच इतर घटकांचा वापर केला जात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. अशा प्रकारे तयार केलेल्या ‘अनालॉग पनीर’चा वापर ग्राहकांना करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
अस्सल पनीर हे प्रामुख्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केले जाते. मात्र कृत्रिम पनीरमध्ये वापरले जाणारे निकृष्ट दर्जाचे घटक आणि चरबी आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात, असे अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार दुग्धजन्य पदार्थ नसलेल्या कृत्रिम वस्तूची ‘पनीर’ म्हणून विक्री किंवा ग्राहकांना देणे नियमबाह्य आहे. त्यामुळे पनीर तयार करताना केवळ शुद्ध दूध आणि मान्यताप्राप्त दुग्धजन्य पदार्थांचाच वापर करावा, अशा स्पष्ट सूचना हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना देण्यात आल्या आहेत.
एक वर्षाच्या कालावधीत कृत्रिम ‘अनालॉग पनीर’चे उत्पादन, वापर आणि वितरण आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta