बेंगळुरू : गेल्या काही दिवसापासून कर्नाटक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी बंगळुरुमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळं झाडं देखील उन्मळून पडली आहेत. या अतिवृष्टीमुळं 27 जिल्हे आणि 187 गावं बाधित झाली आहेत. वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळं लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, सर्वात भीषण परिस्थिती ही कर्नाटक राज्यातील रामनगरात आहे. तिथे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अेनक ठिकाणी रस्त्यावर उभी केलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. कर्नाटकबरोबरच केरळ आणि आंध्र प्रदेशात देखील पाऊस आणि पुरामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.