Monday , September 21 2026
Breaking News

दहावी, बारावीच्या यापुढे दरवर्षी तीन परीक्षा : मधु बंगारप्पा

Spread the love

 

बंगळूर : राज्यातील दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) विद्यार्थ्यांसाठी वर्षातून तीन वेळा परीक्षा लिहिण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी केली.
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विधानसौध येथील बँक्वेट हॉलमध्ये आयोजित शिक्षक दिन सोहळ्याचे उद्घाटन व ४३ शिक्षकांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते.
इयत्ता दहावीमध्ये तीन वेळा परीक्षा दिली जाऊ शकते. मुलांचे वर्ष कोणत्याही कारणाने वाया जाऊ नये यासाठी वर्षातून तीनदा दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी कोणत्याही कारणाने अनुत्तीर्ण झाल्यास त्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाऊ नये. परिक्षेत मुले नापास होऊ नयेत, तर त्यांचे जीवन शिकण्यासाठी असायला हवे, असे सांगून त्यांनी नमूद केले की, नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा लिहून उत्तीर्ण होण्याची संधी मिळेल. ज्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांना पुन्हा अभ्यास करून अधिक गुण मिळवता येतील.
मुलांना शाळेत जाण्यासाठी ऊर्जा लागते. पूर्वी आठवड्यातून एक अंडे दिले जायचे, आता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, राज्यस्तरावर आता ५८ लाख बालकांना या योजनेचा लाभ मिळत आहे, असे ते म्हणाले.
शिक्षकांच्या बदलीनंतर काही ठिकाणी शिक्षकांची कमतरता होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची दखल घेत अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीला परवानगी दिली आहे. सध्या ४३ हजार लोक अतिथी शिक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
रिक्त पदांची भरती
उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर म्हणाले की, पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने भरती करून शिक्षण विभागातील अध्यापन आणि शिक्षकेतर पदांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पावले उचलली जातील.
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी यापूर्वीच परीक्षा घेण्यात आल्या असून नियुक्ती आदेश जारी करण्याची प्रक्रिया बाकी आहे. कायदेशीर गुंतागुंत दूर करून याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ४३ शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले. अध्यक्षस्थानी आमदार रिजवान अर्शद होते. उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर अनेक आजी, माजी आमदार, विधानपरिषद सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *