बेळगाव : राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परिस्थिती बिघडू नये यासाठी सरकारने १५ दिवसांच्या कालावधीत वीकेंड कर्फ्यूसह अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. संपूर्ण लॉकडाऊन रोखणे हा त्यामागचा हेतू आहे. अशी माहिती मंत्री अश्वथ नारायण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री अश्वथ नारायण पुढे बोलताना म्हणाले, कोरोना नियंत्रण तज्ञ समितीच्या सल्ल्यानुसार कोरोना आणि ओमिक्रोनचे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. कार्यालये, पब, बार, थिएटर इत्यादींना केवळ 50 टक्के क्षमतेची सूचना देण्यात आली आहे. खबरदारीच्या उपायांमागे प्रामुख्याने बंगळुरूमधील परिस्थिती सामान्य करण्याचा विचार आहे. त्यामुळे शाळा दोन आठवड्यांपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाढत्या संक्रमणाची खबरदारी घ्यावी मात्र,घाबरून जाऊ नये. दहा दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल त्यांनी सांगितले.