
बेळगाव : तुरमुरी गावातील कचरा डेपोमुळे वाढत चाललेले प्रदूषण आणि त्यावर शाश्वत उपायोजना राबवण्याची गरज याकडे सोशल जस्टीस फोरमने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे .यासोबतच शहराच्या औद्योगिक प्रगतीसाठी सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी ही करण्यात आली आहे. फोरमच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकरी यांना निवेदन सादर करण्यात आले.
तुरमुरी येथील कचरा डेपो मध्ये होत असलेल्या अनियंत्रित व अस्वच्छ कचरा टाकल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी माती व पाण्याचे प्रदूषण होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. फोरमने पर्यावरण पूरक उपाय सुचवताना ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती कचऱ्यापासून वीजनिर्मिती आणि गांडूळ खत प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या उपायोजनांमुळे केवळ प्रदूषण नियंत्रण येणार नाही तर कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक होऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. यामुळे वेस्ट टू वेल्थ संकल्पना प्रत्यक्षात उतरता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
एअर फोर्स गुरुप्रसाद कॉलनी येथे 40 एकर जागेवर सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्याची मागणी ही करण्यात आली आहे. हा प्रकल्प उभारल्यास बेळगाव शहराला औद्योगिक व तांत्रिक क्षेत्रात नवी ओळख मिळेल तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. यासाठी केंद्र सरकार व भारतीय हवाई दलाशी समन्वय साधून आवश्यक परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती करण्यात आली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सोशल जस्टीस फोरमतीने व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी फोरमचे संगम कुलकर्णी, शिरीष तेंडुलकर, अनिल देशपांडे, नकुल लेले, विकास कलघटगी, संतोष कामत व अन्य सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta