बेंगळुरू : वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या नीट (NEET-UG) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (NTA) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी पुनर्परीक्षेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने टेलिग्राम या संदेशवहन प्लॅटफॉर्मवरील प्रवेशावर 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे.
नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तपास सुरू असून, मागील परीक्षेदरम्यान टेलिग्रामच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका विविध ठिकाणी प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच टेलिग्रामवरील संदेश संपादन (Message Editing) सुविधा देखील 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत ही कारवाई केली आहे. परीक्षा काळात गैरप्रकार, अफवा आणि फसवणूक रोखण्यासाठी हा उपाय करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
दरम्यान, पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा खोट्या संदेशांचा प्रसार केला जात असल्याने त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन NTA आणि संबंधित यंत्रणांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta