Sunday , July 26 2026
Breaking News

शनिवारी राजारामबापू पाटील अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

Spread the love

 

शब्दगंध कवी मंडळ संघाच्या विद्यमाने आयोजन : आ. जयंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती

बेळगाव : लोकनेते राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, बेळगाव येथे करण्यात आले आहे. राजारामबापू पाटील ललित कला अकादमी आणि शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माजी मंत्री तथा आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थान येथील सेंट्रल युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे तसेच ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मराठी साहित्यातील अनेक नामवंत साहित्यिक, कलावंत आणि अभ्यासकांची उपस्थिती लाभणार असल्याने बेळगावकरांना समृद्ध साहित्यिक वातावरण अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

लोकनेते राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, सहकार, कृषी, उद्योग आणि सामाजिक विकास या क्षेत्रांत रचनात्मक कार्य करून महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या विचारांचा प्रसार राष्ट्रीय स्तरावर व्हावा तसेच त्यांच्या ध्यासपूर्ण जीवनातून नव्या पिढीतील प्रतिभावंतांना प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने ललित कला व लोककला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे चौथे वर्ष आहे.

आमदार जयंतराव पाटील परिचय
जयंतराव पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जातात. विकासाभिमुख नेतृत्व, संयमी स्वभाव आणि प्रभावी प्रशासकीय कार्यशैली यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनात जलसंपदा, वित्त आणि ग्रामीण विकास यांसारख्या विविध खात्यांचे मंत्रीपद भूषविले आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून शिक्षण, उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला आहे.

डॉ. माणिकराव साळुंखे परिचय
डॉ. माणिकराव साळुंखे हे महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि कुशल प्रशासक म्हणून परिचित आहेत. राजस्थान येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी तसेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण, संशोधन आणि प्रशासकीय गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली. विद्यार्थीकेंद्री शिक्षण, ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. ते प्रभावी वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात.

डॉ. अशोक चौसाळकर परिचय
डॉ. अशोक चौसाळकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात राज्यशास्त्र अभ्यासक, लेखक आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. राजकारण, समाजव्यवस्था, लोकशाही आणि संविधान या विषयांवर त्यांनी सखोल अभ्यास करून लेखन व व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक विचारसरणी आणि लोकशाही मूल्यांची प्रेरणा दिली. त्यांच्या विविध लेखन व व्याख्यानांमुळे ते महाराष्ट्रातील बौद्धिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व मानले जातात.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्य, कला आणि संस्कृती क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *