
खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा व विश्रांतवाडी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील जिर्णोद्धार करण्यात आलेल्या स्थळ दैवत व ग्रामदैवत श्री नागेश महारुद्र मंदिराच्या पुनः प्राणप्रतिष्ठापना व भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १४ मे २०२६ ते शनिवार दि. १६ मे २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या तीन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याबाबत परिसरात उत्साहाचे वातावरण असून सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पहिला दिवस : पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा…
गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मुख्य देवता श्री नागेश महारुद्र यांची पुनः प्राणप्रतिष्ठापना बाळेवाडी मठाचे मठाधीश प. पू. पीर योगी सिंगनाथजी महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात विधीवत पार पडला.
यावेळी पंचधातूयुक्त कळसाचे कळसारोहन, पाषाणातील श्री गणेश मूर्ती, नंदी मूर्ती व कासव प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना तसेच तुळस पूजन आदी धार्मिक विधी पार पडला.
श्री नागेश महारुद्र पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा तसेच विविध देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे तसेच विविध चौकटींचे पूजन करण्यात आले.
दुसरा दिवस : मंदिर उद्घाटन समारंभ…
शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मंदिराचा भव्य उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत सरकार निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई राहणार आहेत.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित आर. आर. आबा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर गाभाऱ्याचे उद्घाटन खानापूर तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव सोमाणा हलगेकर यांच्या हस्ते संपन्न होईल.
यावेळी दीपप्रज्वलनाचा मान खालील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे :
श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील (मा. आमदार, खानापूर)
श्री. अरविंद चंद्रकांत पाटील (मा. आमदार, खानापूर)
सौ. अंजलीताई हेमंत निंबाळकर (मा. आमदार, खानापूर)
श्री. मनोहर कल्लाप्पा किणयेकर (मा. आमदार, उचगाव)
श्री. प्रकाश अप्पासाहेब मरगाळे (अध्यक्ष, मध्यवर्ती म. ए. समिती, बेळगाव)
श्री. रमाकांत कोंडूसकर (अध्यक्ष, श्रीराम सेना, बेळगाव)
श्री. गोपाळराव बळवंतराव देसाई (अध्यक्ष, म. ए. समिती, खानापूर)
यावेळी अनेक प्रतिष्ठित मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून रात्री भजन व कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
तिसरा दिवस : सांस्कृतिक मेजवानी…
शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी रात्री ९.०० वाजता देवानंद कांबळे दिग्दर्शित आणि नागुर्डावाडा ग्रामस्थांच्या सहभागातून सादर होणारा “डाकू संग्राम” हा नाट्यप्रयोग रंगणार आहे.
या कार्यक्रमात गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नाट्यप्रयोगाचे उद्घाटन श्री. नागेश क. पारवाडकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अभिजीत उदयसिंह सरदेसाई इनामदार (खानापूर) राहणार आहेत.
या तीन दिवसीय धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार असून नागुर्डा परिसरासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta