
21 हजार दिव्यांग, विधवा व वृद्धांच्या पेन्शनवर गंडांतर
खानापूर : खानापूर तालुक्यातील सुमारे 21 हजार दिव्यांग, विधवा आणि वृद्धांच्या पेन्शनवर महसूल विभागाने स्थगिती दिल्याने संबंधित लाभार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. ही गंभीर समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी खानापूरचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी दुंडप्पा कोमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात सर्व तलाठी (गाव लेखापाल), महसूल निरीक्षक आणि नायब तहसीलदार यांना योग्य व पारदर्शक सर्वेक्षण करण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, जेणेकरून कोणत्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे. दिव्यांग, वृद्ध आणि विधवा व्यक्तींना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांची पेन्शन तातडीने पुन्हा सुरू करणे अत्यावश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.
यावर प्रतिसाद देताना तहसीलदारांनी योग्य सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात येईल व पेन्शन लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी प्रशासन आवश्यक ती पावले उचलेल, असा विश्वास दिला.
दरम्यान, तालुक्यातील वीज व्यवस्थेबाबतही निवेदनात मागणी करण्यात आली. हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (हेस्कॉम) खानापूर विभागाने वारंवार होणारा वीज खंडित होण्याचा प्रकार थांबवून रिपेअर, फांद्या कटिंग आदी कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच वीज व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तहसीलदारांनी संबंधित विभागाला समज द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, प्रमोद सुतार, परशराम बेळगावकर, रामचंद्र लोहार, मर्यप्पा पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta