
बेळगाव : उद्यमबाग रोडवरील सुरू असलेल्या रस्ते कामादरम्यान लोखंडी सळ्या उघड्या अवस्थेत ठेवण्यात आल्याने नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर योग्य सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे हा प्रकार गंभीर अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या मार्गावरून दररोज विद्यार्थी, कारखाना कामगार, दुचाकीस्वार तसेच शेकडो नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. अशा परिस्थितीत उघड्या लोखंडी सळ्या आणि अपुऱ्या बॅरिकेड्समुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या वाहनाचा किरकोळ तोल जरी गेला किंवा एखादा पादचारी घसरला तरी गंभीर दुखापत अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या काही ठिकाणी तात्पुरते बॅरिकेड्स उभारण्यात आले असले तरी ते अपुरे असल्याची टीका होत आहे.
“काम सुरू आहे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा परवाना नाही. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
संबंधित विभाग आणि कंत्राटदारांनी तातडीने मजबूत बॅरिकेड्स, परावर्तित सूचना फलक तसेच उघड्या लोखंडी सळ्यांवर संरक्षणात्मक कव्हर बसवावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta