
बेळगाव : पेरणीच्या तोंडावर बी-बियाणे आणि खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, युरियासह विविध खतांचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करत शेतकरी नेते प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी (एडीसी) यांना निवेदन सादर केले.
निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, अनेक ठिकाणी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसून काही विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा दर आकारत आहेत. परिणामी, पेरणी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून खत व बियाण्यांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा.
तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी मोहीम राबवून खत व बियाण्यांच्या काळाबाजारावर आळा घालावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास असल्याचे सांगत, बी-बियाणे व खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, तसेच कृषी विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवून काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
या निवेदनावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, माजी तालुका पंचायत सदस्य मारुती लोकूर यांच्यासह विविध गावांतील २५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत, खत व बियाण्यांचा तुटवडा आणि काळाबाजार तातडीने रोखला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta