बेळगाव : एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षांमधील यश हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया ठरते. या परीक्षांमध्ये मिळविलेले यश केवळ गुणांचे मोजमाप नसून उच्च शिक्षण आणि करिअरच्या नव्या संधींचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुढील शैक्षणिक वाटचाल यशस्वी करावी, असे प्रतिपादन बेल्लद लॉ कॉलेज तसेच गुजरात लॉ विद्यापीठाच्या प्राचार्या डॉ. शोभलता उदपीडी यांनी केले.
सदाशिवनगर येथील गौरी महिला मंडळातर्फे आयोजित प्रतिभा पुरस्कार वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौरी महिला मंडळाच्या अध्यक्षा महादेवी हंगरगी होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्षा राशीकला जगजम्पी, सचिव सुजाता गोकाक यांच्यासह मंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. उदपीडी यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर निवड आणि व्यक्तिमत्त्व विकास याविषयी मार्गदर्शन केले. यशाचा आनंद साजरा करत असतानाच पुढील उद्दिष्टे निश्चित करून सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षा महादेवी हंगरगी यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला गौरी महिला मंडळाच्या सर्व सभासदांसह महिला वर्ग, विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे संपूर्ण परिसरात शैक्षणिक प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.
Belgaum Varta Belgaum Varta