एकरी ३० किलो सोयाबीन ; मूग, उडीदही उपलब्ध
निपाणी (वार्ता) : जून महिन्यापासून खरीप हंगामाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शिवार तयार ठेवले आहे. सोमवारपासून (ता.१) येथील रयत संपर्क केंद्रातर्फे सोयाबीन व इतर बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि शेताचा उतारा आवश्यक आहे. सदरची बियाणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये दिली जाणार आहेत.
बहुतांश शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे पूर्ण केले आहेत. काही शेतकऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात आहे. अद्याप म्हणावा तसा वळीव पाऊस न झाल्याने जमिनीत ओल नाही. तत्पूर्वीच रयत संपर्क केंद्रात सोयाबीन,उडीद, मूग याने उपलब्ध झाले आहेत. आज पासून त्याचे निपाणीतील केंद्रासह बेनाडी, कुरली, सौंदरगा केंद्रात वाटप होणार आहे. प्रति एकरी ३० किलो सोयाबीन, मूग पाच किलो आणि उडीद पाच किलो सबसिडीच्या दारात दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणांचा साठा उपलब्ध केला आहे. त्यामुळे गर्दी न करता शेतकऱ्यांनी सुरळीतपणे बियाणांचा लाभ घेण्याचे आवाहन रयत संपर्क केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
—-
‘अद्याप मोठा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओल कमी आहे. वळीव अथवा मान्सून पाऊस पडल्यानंतरच
शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणी करावी. शिवाय उगवण क्षमता आणि जमिनीतील आद्रता महत्त्वाची आहे.’
-दीपक कौजलगी,
कृषी अधिकारी, रयत संपर्क केंद्र,निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta