बेळगाव : राणी चन्नम्मा चौक परिसरातील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने शहरातील अनेक भागांचा बुधवारी (दि. ३) पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गळती दुरुस्तीसाठी तातडीने काम सुरू करण्यात आल्याने संबंधित भागांमध्ये नियोजित पाणीवाटप करता आले नाही. याची नोंद घेऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासन आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
उन्हाळ्याच्या काळात आधीच अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असताना आता जलवाहिनी गळतीची समस्या उद्भवल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अनेक भागांत पहाटेच्या वेळी पाणीपुरवठा केला जातो. मात्र बुधवारी सकाळी ठरलेल्या वेळेत पाणी न आल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली.
गळतीच्या दुरुस्तीमुळे बागवान गल्ली, खडे बाजार, दरबार गल्ली, भोई गल्ली, पांगुळ गल्ली, मोमीन गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, रविवार पेठ, कलईगार गल्ली, कामत गल्ली, कसाई गल्ली, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोनवाळ गल्ली, शेरे गल्ली, मठ गल्ली, मुजावर गल्ली, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, महाद्वार रोड परिसर, संभाजी गल्ली, आठवले चाळ, एसपीएम रोड, वीरभद्रनगर, गुड्स शेड रोड, फारुकिया कॉलनी, अहमदनगर तसेच पोलीस क्वार्टर्स परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, गळतीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta