
बेळगाव : कावळेवाडी येथील चव्हाट गल्ली परिसरात भाऊबंदकीच्या जमीन वाटपाच्या वादातून झालेल्या कथित मारहाण प्रकरणात दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
फिर्यादी लक्ष्मी यशवंत बुरुड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती यशवंत बुरुड तसेच राजाराम व यल्लाप्पा बुरुड यांच्यात शेती आणि घराच्या वाटणीवरून दीर्घकाळ वाद सुरू होता. कमी जमीन मिळाल्याच्या कारणावरून संबंधितांमध्ये वारंवार वाद होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, २८ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास लक्ष्मी बुरुड या घरासमोर काम करत असताना आरोपींनी जमिनीच्या वादातून त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच लाकडी टोण्याने त्यांच्या डोक्यावर व शरीरावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. वाद मिटविण्यासाठी आलेल्या यशवंत बुरुड यांनाही मारहाण करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. याशिवाय जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला होता.
घटनेनंतर जखमींना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४८, ३५४, ३२४, ५०४, ५०६ सह १४९ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
मात्र, खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळलेल्या विसंगतींचा विचार करून न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध झाले नसल्याचे नमूद केले. त्यानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
निर्दोष मुक्तता मिळालेल्या आरोपींमध्ये राजाराम नागाप्पा बुरुड, यल्लाप्पा नागाप्पा बुरुड, लक्ष्मी यल्लाप्पा बुरुड, लता राजाराम बुरुड आणि शटुली नागाप्पा बुरुड (सर्व रा. चव्हाट गल्ली, कावळेवाडी) यांचा समावेश आहे.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचनणावर आणि ऍड. मारुती कामाणाचे यांनी बाजू मांडली.
Belgaum Varta Belgaum Varta