

बेळगाव (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने सरकारी पदवीपूर्व (पीयूसी) महाविद्यालयांमध्ये डिजिटल हजेरी प्रणाली लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या ‘निरंतर’ या विशेष उपक्रमांतर्गत ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. यामुळे वर्गात विद्यार्थ्यांची नावे पुकारून हजेरी घेण्याची पारंपरिक पद्धत इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी अत्याधुनिक फेशियल रिकग्निशन (चेहरा ओळख) तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वयंचलितपणे नोंदविली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ही प्रणाली केवळ सरकारी पीयूसी महाविद्यालयांमध्ये प्रायोगिक स्वरूपात लागू केली जाणार आहे. त्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसाद आणि परिणामांचा आढावा घेऊन राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्येही या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी वर्गांना दांडी मारणे किंवा लेक्चर्स बंक करणे यासारख्या प्रकारांकडे वळत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर अचूक नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नियमित वर्ग उपस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी ही डिजिटल हजेरी प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, शिस्त आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास आणि शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta