बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न, सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय, कन्नड सक्ती आणि विविध प्रशासकीय अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी पत्राद्वारे केली आहे.
यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी ३१ मे २०२६ रोजी सादर केलेले निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. या निवेदनात सीमाप्रश्नासंदर्भात तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस संबंधित मंत्री, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
सीमाप्रश्नाबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta