
येळ्ळूर : हणमंतगौंड नगर, येळ्ळूर येथील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी परिसरात नवीन बस थांब्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला एक लेखी निवेदन माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय नियंत्रण अधिकारी के. एल. गुड्डण्णावर आणि के एस आर टी सी अधिकारी विजयालक्ष्मी पुजारी यांना देण्यात आले.
सध्या हणमंतगौंड नगर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये शाळेत जाणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मात्र, या भागात अधिकृत बस थांबा नसल्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना दूरवर चालत जावे लागते, ज्यामुळे अनेकदा त्यांची शाळा-कॉलेजची बस चुकते, रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते, ज्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, योग्य थांबा नसल्याने चालकांनाही बस कोठे थांबवावी याचा अंदाज येत नाही, परिणामी प्रवाशांना ताटकळत राहावे लागते.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने म्हटले आहे की, या भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. बस थांब्याअभावी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर येथे बस थांबा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
प्रशासनाने हे निवेदन स्वीकारले असून, या समस्येवर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी माजी ग्राम पंचायत शिवाजी नांदुरकर, दिलीप पाटील, शिक्षिका रेणुका ताशीलदार, चंद्रकांत पाटील, नारायण दळवी, अनिल पाटील, राजु पाटील, एकनाथ पाटील, महादेव कदम, प्रकाश पाटील, जगन्नाथ पाटील, प्रवीण पाटील, सुशांत पाटील, सुरेश पाखरे, निरंजन दळवी, ओमकार पाटील, हणमंतगौंड नगरमधील अनेक नागरिक, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta