बेळगाव : ग्रामीण भागातील तुरमुरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कचरा डेपोमुळे नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून हा डेपो तातडीने अन्यत्र हलविण्याची मागणी केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा प्रशासनाने यापूर्वी कचरा डेपो स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याने समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
गेल्या सुमारे २० वर्षांपासून या कचरा डेपोमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी अनेक वेळा चौकशी होऊन अहवाल सादर झाले, मात्र संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांचे नेते नागराज जाधव यांनी बेकायदेशीरपणे सुरू असलेला कचरा डेपो तात्काळ हटविण्याची मागणी करत, अन्यथा सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी तुरमुरी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta