बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारकडून हालचालींना वेग आला असून सामान्य प्रशासन विभागाकडून बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
उच्चाधिकार समितीची बैठक मंगळवार, ३० जून रोजी होणार होती. या बैठकीस तज्ज्ञ समितीचे सदस्य आणि सीमाप्रश्नाची बाजू मांडणारे कायदेतज्ज्ञ उपस्थित राहणार होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र सरकारने ही बैठक पुढे ढकलली होती.
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनकाळातच बैठक घेण्यात यावी, अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली होती. त्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मागील दोन दिवसांपासून बैठकीबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यासाठी संबंधित मंत्री, उच्चाधिकार समितीचे सदस्य तसेच तज्ज्ञ समितीच्या सदस्यांच्या उपलब्धतेनुसार बैठकीची तारीख निश्चित केली जाणार आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उच्चाधिकार समितीची बैठक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने सीमाभागातील नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या असून, या बैठकीत सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन लढ्याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta