
बेळगाव : बेळगावच्या हवाई संपर्काला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही बेळगाव–दिल्ली दैनंदिन विमानसेवा बंद करून ती आठवड्यातून केवळ तीन दिवसांपुरती मर्यादित करण्यात आली आहे. १ जुलैपासून हा बदल लागू झाला असून ऑक्टोबरपर्यंत हेच वेळापत्रक कायम राहणार आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी, नोकरदार तसेच नियमित प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
देशाची राजधानी दिल्लीसह मुंबई, बेंगळुरूसारख्या महानगरांशी जलद संपर्क साधण्यासाठी बेळगावमधील प्रवासी मोठ्या प्रमाणात विमानसेवेचा वापर करतात. वेळेची बचत आणि सोयीस्कर प्रवासामुळे या मार्गाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, विमान कंपनीने इंधनाच्या वाढत्या किमती आणि परिचालन खर्चाचे कारण देत दिल्लीवरील दैनंदिन सेवा कमी केली आहे.
बेळगाव विमानतळावरून सध्या दिल्ली, मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरूसाठी थेट विमानसेवा उपलब्ध असली तरी गेल्या वर्षभरात बंद करण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील उड्डाणे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे बेळगावचा हवाई संपर्क विस्तारण्याऐवजी तो दिवसेंदिवस मर्यादित होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.
उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या बेळगावसाठी सक्षम हवाई सेवा अत्यावश्यक आहे. मात्र वाढत्या मागणीच्या काळातच विमान फेऱ्या कमी केल्या जात असल्याने भविष्यात आणखी काही मार्गांवरील सेवा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा उद्योग क्षेत्रासह पर्यटन आणि व्यावसायिक व्यवहारांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Belgaum Varta Belgaum Varta