


बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या नुकसानीची भीती निर्माण झाली आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी, गाळ आणि कचरा साचल्याने पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
यामुळे शेतातील पाणी नाल्यात न जाता शेतातच तुंबून राहिले आहे. परिणामी केवळ नाल्यालगतची शेतीच नव्हे, तर सुमारे दोन किलोमीटर परिसरातील शेतीही पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षीही पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली असून, योग्य ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने नाल्यातील जलपर्णी, गाळ आणि कचरा हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. यामुळे निदान खरीप हंगामातील पिके वाचविण्यास मदत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून बळ्ळारी नाल्याचा नियोजनबद्ध विकास आणि नियमित स्वच्छता न झाल्यामुळे ही समस्या वारंवार उद्भवत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta