बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज दुपारी बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर सीमाभागातील मराठी भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्नाबाबत चर्चा केली. कासरगोड जिल्ह्यातील कन्नड भाषिक अल्प संख्याकांचे संदर्भात केरळ सरकारने अल्पसंख्यांक आयोगाला दिलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. विविध विभागातील अधिकारी वर्गासमवेत बैठक आयोजित करून जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मराठी शाळासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी श्री. हिरेमठ यांनी दिली.
शिष्टमंडळात अध्यक्ष श्री. दीपक दळवी, सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, चिटणीस रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी यांचा समावेश होता.
महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील बेळगावला आले होते. समितीच्या नेत्यांनी त्याची भेट घेऊन चर्चा केली. उच्चाअधिकार समिती, तज्ज्ञ समिती कोर्ट कामकाज इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.