Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील ‘ती’ गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळा

Spread the love

 

खानापूर तालुका म. ए. समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील संबंधित 62 गावे इको सेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेतून वगळण्यात यावीत. त्याचप्रमाणे या झोन संबंधी आक्षेप नोंदवण्यासाठीची 60 दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
डॉ. रंगराजन यांच्या कस्तुरीरंगन अहवालानुसार खानापूर तालुक्यातील 62 गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. खानापूर तालुक्यातील ही बहुसंख्य गावे पश्चिम भागात येत असून या भागाची लोकसंख्या जवळपास 30 हजारहून अधिक आहे. या सर्वांना इकोसेन्सिटिव्ह झोनमुळे नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे आणि त्यांच्या उत्पन्नाच्या साधनावर टाच येणार असून भविष्यात त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागणार आहे. या बाबींची राज्य व केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेऊन जारी केलेली अधिसूचना मागे घ्यावी. यासंबंधी खानापूर तालुका म. ए. समितीने गेल्या 5 मार्च 2017 रोजी निवेदनाद्वारे खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील ही 62 गावे इको सेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेतून वगळण्यात यावीत, अशी मागणी राज्य सरकार व संबंधित खात्याकडे केली होती तसेच केरळच्या धरतीवर खानापूर तालुक्यातील गावांना मुभा देण्यात यावी अशी मागणी खानापूर समितीने केली आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केल्याबद्दल सदर 62 गावातील जनतेचाही त्याला विरोध आणि आक्षेप आहे. त्याचबरोबर इको सेन्सिटिव्ह झोन संबंधी आक्षेप नोंदवण्यासाठी 60 दिवसांची दिलेली मुदत अपुरी असून ती वाढवण्यात यावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
यावेळी निवेदन सादर करतेवेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्यासह निरंजन सरदेसाई, धनंजय पाटील, देवापण्णा गुरव, राजू पाटील, रवींद्र शिंदे, संभाजीराव देसाई, पी. एच. पाटील, रवींद्र पाटील, सुरेशराव देसाई, बळीराम पाटील, रामचंद्र गावकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते. मध्यवर्ती समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घडवून आणली.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *