कोल्हापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहेत. यावेळी ते एकटे उपोषणास बसणार, असे त्यांनी जाहीर केले असले तरी, संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व स्तरांतून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. राज्यभरातून मराठा समाजाची २६ फेब्रुवारी रोजी उस्फूर्तपणे आझाद मैदानाकडे येण्याचीही तयारी सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे.
