Monday , September 21 2026
Breaking News

“भाजपाकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी”, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे विधान

Spread the love

 

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळालं आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपाकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची सुरुवात करण्यात आली आहे, असं मोठं विधान राऊत यांनी केलं. तसेच आगामी कोणत्याही निवडणुकीत महाविकास आघाडीच जिंकेल, असा विश्वासही व्यक्त केला.

पुणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विनायक राऊत म्हणाले, “आगामी कोणत्याही निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकणार म्हणजे जिंकणारच आहे. ते कितीही एकत्र आले, कितीही गळाभेटी घेतल्या, तरीही महाविकास आघाडी जिंकणार आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार असल्यामुळे महाविकास आघाडीचाच विजय होईल.”

मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य करताना खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आपण मागच्या अनेक महिन्यांपासून बोलत आहोत. त्यांची (शिंदे गट) कितीही पोपटपंची सुरू असली तरी मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. भाजपा त्यांना मंत्रीमंडळ विस्तार करू देणार नाही. याउलट भाजपाकडून एकनाथ शिंदेंची आणि त्यांच्या गटाच्या विसर्जनाची सुरुवात झाली आहे.”

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाचे आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, या चर्चेबाबत विचारलं असता विनायक राऊत पुढे म्हणाले, “शिंदे गटाच्या आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. पण आम्ही त्यांच्यासाठी अजून दरवाजे उघडलेले नाहीत. ते गद्दारी करून तिकडे गेलेत, त्यांची गद्दारी त्यांना लखलाभ होऊ द्या, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीच त्यांना धडा शिकवेल. ज्यांच्या मनात एकदा बेईमानी घुसली आहे, त्यांना जवळ करून अशी औलाद पाळण्यापेक्षा निष्ठावंत शिवसैनिकांना घेऊन पुढे जाईन, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याला महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळत आहे.”

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *