मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे यासाठी राज्यातील शिवसेनाप्रेमी मराठी नागरिकांनी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर या दिशेने पहिले सकारात्मक संकेत दोन्ही ठाकरे बंधूनी दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ बाबी बाजूला ठेवून उध्दव ठाकरेंच्यासोबत जाण्याची तयारी राज ठाकरे यांनी दाखविल्यानंतर किरकोळ बाबींना बाजूला ठेवण्याची तयारी काही अटीशर्तींसह उध्दव ठाकरेंनीही दाखविल्याने आता तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे.
राज ठाकरे यांनी भाजप, शिवसेना(शिंदे) गटाशी मैत्री तोडली तर नक्कीच सोबत येऊ शकतो, असे स्पष्ट संकेत उध्दव ठाकरेंनी दिले.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव में Truth’ या व्हिडिओ पॉडकॉस्टमध्ये राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला. आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापेक्षा वाद आणि भांडणे खूप छोटी आहेत, असे म्हणत राज ठाकरेंकडून शिवसेनेला एकप्रकारे प्रस्ताव दिला आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी काही अटींसह मनसेसोबत जाण्याची तयारी दाखविली आहे. “मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी देखील किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे. मी देखील मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करतो. पण माझी एक अट आहे,” असे उध्दव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतीत बसणार हे आधी ठरवा. मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. माझ्याकडून कुणाशी भांडणे नव्हतीत, पण मिटवून टाकली चला. सर्व मराठी माणसांनी ठरवायचे भाजपसोबत जायचे की शिवसेनेसोबत म्हणजे एसंशिं, गद्दार नव्हे तर माझ्यासोबत जायचे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.