

हमीरपूर : यमुना नदीच्या पलीकडे शेतात टरबूज खाण्यासाठी १० जण बोटीने निघाले होते. पण यमुना नदीत काळाने झडप घातली. भरनदीत बोट उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अद्याप ४ जण बेपत्ता आहेत. ४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात सुमेरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी SDRF आणि गोताखोरांचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये धरणात बोट बुडून १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रेदशमधील ही धक्कादायक घटना समोर आली. टरबुज खाण्यासाठी १० जण बोटीने यमुना नदी पार करत होते. पण अचानक नदीत अर्ध्यावर बोट उलटली अन् १० जण यमुना नदीत पडले. यात ५ लहान मुलांसह ६ जण बेपत्ता झाले. तर ४ जणांना तात्काळ वाचवण्यात आले. बेपत्ता झालेल्यांपैकी २ जणांचे मृतदेह बचाव पथकाला मिळाले आहेत. इतर ४ जणांचा शोध घेतला जात आहे.
बुधवारी संध्याकाळी कुतुबपूर पाटिया गावाजवळ लहान मुले आणि महिलांसह १० जणांना घेऊन जाणारी एक बोट उलटली. एका लग्नसमारंभाला हजेरी लावल्यानंतर खरबूज खाण्यासाठी ही बोट यमुना नदीच्या पलीकडे जात होती. पण अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे आनंदाचे रूपांतर दुःखात झाले. बेपत्ता असणाऱ्यांसाठी एसडीआरएफ, पीएसी आणि स्थानिक प्रशासनाची पथके बचावकार्य करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरारा ब्लॉकच्या भाऊली गावातील देशराज निषाद यांच्या घरी विवाह सोहळा सुरू होता. वरात गेल्यानंतर काही नातेवाईक मागे थांबले होते. बुधवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास गावकरी खरबूज खाण्यासाठी यमुना नदी पार करण्याकरिता बोटीत बसले. बोटीत महिला, पुरुष आणि मुलांसह एकूण १० जण होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बोट यमुना नदीच्या मध्यभागी पोहोचताच तिचा तोल गेला आणि ती उलटली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सर्वजण पाण्यात पडले आणि काही क्षणातच दिसेनासे झाले. आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २ जणांचे मृतदेह मिळाले असून चौघांचा शोध घेतला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta