


मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटील यांनी माफी मागितली असली तरी ती आम्हाला मान्य नाही, संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी असून त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचा इशारा एस. एम. देशमुख यांनी दिला आहे..
शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या संजय दिना पाटील यांनी आपला सारा राग त्यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर काढला..” पुन्हा माझ्याकडे आलात तर मारून टाकील” असे सांगत त्यांनी पत्रकारांना शिविगाळ केली.. ते एवढय़ावरच थांबले नाहीत तर “तुम्हाला कुठं जायचं तिकडं जा आणि माझी तक्रार करा” अशी मस्तवालपणाची भाषा वापरली.. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले..
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने संजय दिनाच्या अरेरावीचा निषेध केला.. महाड, पाटण, पिंपरी चिंचवड, नांदेड आदि ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रारी आणि निवेदन देण्यात आली.. सर्व वाहिन्यांवरून निषेधाचे सूर व्यक्त झाले.. राजकीय पक्षांनी देखील निषेध केल्यानंतर संजय दिना पाटील यांना उपरती झाली आणि त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपला माफीनामा सादर केला.. मात्र अगोदर अर्वाच्च शिविगाळ करायची, काय करायचं ते करा म्हणत धमकी द्यायची आणि प्रकरण अंगलट आलं की माफी मागायचं नाटक करायचं ही नौटंकी आम्हाला मान्य नाही..असे एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे..
“तुम्ही अपराध केला आहे त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे” अशी आमची मागणी असून त्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती उद्या ठिकठिकाणी पोलिसात तक्रारी देऊन गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरतील तसेच जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन देऊन संजय दिना यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करतील असेही एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta