शिक्षण संस्थेच्या सी.ई.ओ. ऐश्वर्या हवले यांची माहिती
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या संजय कॉलेज ऑफ फार्मसी येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या प्रथम आणि तृतीय सत्र परीक्षेत यश मिळविले आहे. सीमाभागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषध निर्माणशास्त्राचे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करीत येत असल्याची माहिती शिक्षण संस्थेच्या सीईओ ऐश्वर्या हावले यांनी दिली.बोरगांव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या संजय कॉलेज ऑफ फार्मसी, विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्राच्या व तृतीय सत्राच्या परीक्षेतील निकाल जाहीर करण्यासह गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
अपेक्षा कोगनोळे यांनी स्वागत केले.
बेंगलोर येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या फार्मसी परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यश प्राप्त केले आहेत. सीमाभागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून करिअर घडविता यावे, तसेच स्वतःचा उद्योग सुरू करण्याची किंवा नामांकित औषधनिर्माण कंपन्यांमध्ये रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने श्री विद्यासागर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी बोरगाव येथे संजय कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना केली.वाढत्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिक्षण घेऊन आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल करावी यासाठी विद्यासागर शिक्षण संस्था नेहमीच कार्य करीत असल्याचे ऐश्वर्या हवले यांनी सांगितले.
तिसऱ्या सत्रा मध्ये गायत्री चव्हाण हिने ७९.४५ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम, तर पहिल्या सत्रामध्ये श्रेया पाटील हिने ७६.२० टक्के गुण मिळवून प्रथम, सुहाना गवंडी हिने ७३.३७ टक्के गुण मिळवून व्दितीय, तर ऋतुजा कामगोंडा हिने ७१.४० गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. यावेळी प्राचार्य संदीप मुर्तले, कॉन्व्हेन्ट शाळेचे मुख्याध्यापक राजू खिचडे, प्रा. दर्शन पाटील, प्रीती मगदूम, अजित हावले, सुजित लाटवडे, तुषार बोरगावे, अभिजीत मानगावे, रमेश हेगाजे, आनंद फिरगन्नावर, व्ही. के. थोरात उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta