पाऊस अद्यापही गायब; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प
निपाणी (वार्ता) : मशागतीची कामे आटोपून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या बळिराजाची चिंता अधिक वाढली आहे. सुरवातीला दोन-तीन वेळा झालेल्या पावसानंतर तालुक्यातील सुमारे १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी खते आणि बियाण्यांची खरेदी करून ठेवली खरी, मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने संपूर्ण पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील कृषी केंद्रे ओस पडू लागली आहेत.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कृषी केंद्रचालकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून विविध कंपन्यांकडून बियाणे आणि खतांचा साठा मागवून ठेवला आहे. परंतु पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुकानांमध्ये आणलेल्या मालाची ‘थप्पी’ जागेवरून हललेली नाहीत. पाऊस नसल्याने शेतकरी खते, बियाणे खरेदीसाठी बाजारात फिरकेनासा झाला आहे. त्यामुळे विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या बाजारपेठेत बहुतांश बियाणे आणि
खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. डीएपी आणि युरियाची कमतरता नाही. आता साऱ्यांच्या नजरा फक्त पावसावर आहेत, असे शहरातील कृषी केंद्र चालकांनी सांगितले.
——————————————————————–
‘जून महिन्यात पावसाला प्रारंभ होईल, या धर्तीवर खते बियाणे खरेदी करून ठेवले आहेत. पण ढगाळ वातावरण होऊनही पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम लामणीवर पडण्याची शक्यता आहे.’
-अण्णाप्पा देशिंगे, शेतकरी
Belgaum Varta Belgaum Varta