


दक्षिण भारत जैन सभेच्या १०४ व्या नैमित्तिक अधिवेशन
निपाणी (वार्ता) : जैन समाजाने संस्कार, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, सहकार, सामाजिक सेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासह समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. दक्षिण भारत जैन सभेतर्फे कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित १०४ व्या नैमित्तीक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे,.उद्योजक अभिनंदन पाटील, जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, युवा नेते उत्तम पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, समित कदम, रवींद्र माणगावे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक रत्नेश शिरोडकर, प्रतिज्ञा उत्तुरे उपस्थित होते. अधिवेशनादरम्यान स्वस्ति लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी आणि नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी आशीर्वाद झाले.
पालकमंत्री म्हणाले जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून महावीर अध्यासन केंद्र पूर्णत्वासाठीच्या मागण्या प्रस्ताव आले. याचा योग्य तो विचार करून ते अद्यावतपणे उभारू, जैन समाजाचे रखडलेले प्रश्न सोडवणुकीसाठी शासनामार्फत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, दक्षिण भारत जैन सभेचे कौतुक करावे लागेल. बामणी गावातील भगवान महावीरांच्या पुरातत्व मंदिराचा जीर्णोद्धार असो किंवा कागल मधील जमिनीचा विषय लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
श्रीमंत शाहू महाराज यांनी, जैन समाज हा राष्ट्रसेवा आणि जनसेवा करणारा आहे असे उद्गार काढले. सभेच्या अधिवेशनातील मागण्या आणि अन्य गोष्टींसाठी पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.
आमदार सतेज पाटील यांनी, अधिवेशनाच्या माध्यमातून समाजातील प्रश्न आणि अडचणीवर प्रकाश टाकला जाईल. जैन समाज हा शांतता प्रिय असून त्याचबरोबर चुकीच्या गोष्टींवरती संघटित पणे लढा देणार आहे . सम्मेद शिखरजी आंदोलन किंवा माधुरी हत्तीचा लढा हा याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. समाजाच्या शेतकरी संघाच्या जागे बाबतचा प्रश्न असो किंवा अन्य कोणतीही बाब सर्व राजकीय मंडळी लोकप्रतिनिधी मिळून समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगितले.
उत्तम पाटील म्हणाले, अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि मानवकल्याणाचा संदेश देणाऱ्या जैन धर्माची शिकवण आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे. जैन समाजाने केवळ धार्मिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता शिक्षण संस्था, वसतिगृहे, आरोग्य सेवा, उद्योग-व्यवसाय आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलला आहे. स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी सभेला ऊर्जेत अवस्था आणले व सभा आणि समाज यांच्यात समन्वय साधल्याचे सांगितले.
समाज एक संघ करण्याचा प्रयत्न केला. ३ कोटी निधीची मागणी
आमदार राहुल आवाडे यांनी बाहुबली आणि कुंथनगिरी देवस्थानाला ९.९ कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री आणि राज्य शासनाचे आभार मानले. मतदार संघातील या देवस्थानांकडे जाणारे मार्ग आसपासच्या गावांच्या विकासासाठी आणखी तीन कोटी निधी द्यावा अशी मागणी ही पालकमंत्र्यांकडे केली.
या प्रसंगी केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब जी. पाटील, दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन संजय शेटे, व्हाईस चेअरमन अभिनंदन पाटील, श्रीमती मीनाक्षी पाटील, मुख्य महामंत्री अनिल बागणे, खजिनदार बाळासाहेब पाटील, संघटन मंत्री शशिकांत राजोबा, ट्रस्टी अजित पाटील, राजेंद्र झेले ,दादा पाटील चिंचवडकर, अनिल मादनाईक, सौ. विनयश्री पाटील यांच्यासह दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी उपस्थित होत्या.

Belgaum Varta Belgaum Varta