
चांगला पाऊस झाल्याचा परिणाम : नवनवीन जातीच्या उत्पादनाकडे कल
निपाणी (वार्ता) : तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत असून विहिरीही भरल्या आहेत. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीकडे वळले असून परिसरातील शेतशिवारात ऊस लागवडीची लगबग पाहावयास मिळत आहे. निपाणी तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कुपनलिकानाही पाणी वाढले आहे. त्यामुळे सध्या पाण्याची चांगली सुविधा उपलब्ध असल्याने शेतकरी ऊस लावणीच्या कामाला प्राधान्य देत आहेत.
उसाच्या नवनवीन जातीचा शोध घेत उशिरा पक्व होणाऱ्या व अधिक उत्पादन देणाऱ्या उसाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ऑगस्ट महिन्यात उसाची लागवड झाल्यास वेळेत कारखाना तोड होऊन उत्पादन अधिक निघण्यास मदत होत असल्यामुळे शेतकरी उसाची लागवड करीत आहेत.सोयाबीनच्या बाजारभावात गेल्या दोन वर्षांत सतत घटच होत आहे. हंगामावेळी बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री होत आहे. त्यामुळे पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीचा पर्याय निवडला आहे. एकरी पन्नास टनांपर्यंतही उत्पादन निघाले तरी मागील वर्षीच्या दराप्रमाणे दीड लाख रुपये उसातून उत्पादन निघते. एकरी ३० हजार रुपयांपर्यंतही खर्च झाला तरी एक लाख रुपये हमखास उत्पादन निघत असल्यामुळे शेतकरी ऊसशेतीला प्राधान्य देत आहेत.
——————————————————————–
‘सोयाबीन काढणीनंतर शेतीची नांगरणी, रुटर करून सरी सोडणे, लावणीसाठी उसाची रोपे किंवा बियाणांचा खर्च, मजूर यावरही खर्च करावा लागत आहे. लागवडीपूर्वीची मशागत खताचा डोस, लावणीसाठी ऊस किंवा रोपे असा एकत्रित एकरी २० ते ३० हजार रुपयापर्यंत खर्च येत आहे.’
-गोपाळ कुलकर्णी, शेतकरी, मलिकवाड

Belgaum Varta Belgaum Varta