विजयपूर : पंचमसाली समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा निष्कर्ष लवकरात लवकर काढण्यात यावा, अशी मागणी कुडलसंगम पंचमसाली पिठाध्यक्ष जय मृत्युंजय स्वामीजींनी केली आहे.
विजयनगर येथे पत्रकारांशी बोलताना जय मृत्युंजय स्वामी म्हणाले, सरकारला दिलेला अवधी आता संपुष्टात आला आहे. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सभागृहात आरक्षणाच्या मागणीवर आवाज उठविला होता. 14 एप्रिल हि अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीच्या आत पाऊल न उचलण्यात आल्यास कुडलसंगम येथे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वामीजींनी दिला. इंचगेरी कार्यक्रमात आरक्षणासंदर्भात आंदोलन समितीची बैठक होणार असून महामेळाव्याचे आयोजन करून सरकारवर दबाव आणण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कित्तूर राणी चन्नम्मा पुतळ्याचे 10 एप्रिल रोजी अनावरण होणार आहे. 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता इंचगेरी येथे आमदार बसनगौडा पाटील यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती कुडलसंगम पंचमसाली पिठाध्यक्ष जय मृत्युंजय स्वामी यांनी दिली. या कार्यक्रमात 25 हजाराहून अधिक समाज बांधव सहभागी होणार आहेत, अशीही माहिती स्वामीजींनी दिली.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/04/252-660x330.jpg)