
बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील कथित सत्तासंघर्षाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या काल संध्याकाळी दिल्लीला गेले असून सकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसमधील सत्तावाटप, नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे निर्माण झालेला संभ्रम आणि विविध नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वाढलेली राजकीय उत्सुकता यावर या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सूचक वक्तव्य केले. “उद्या सकाळी ११ वाजताचा मुहूर्त ठरला आहे. सर्व गोंधळावर पडदा पडेल. मुहूर्त निश्चित झाला असला तरी बैठकीचा अजेंडा नेमका काय आहे, याबाबत माहिती नाही. तिथे कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, हेही स्पष्ट नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,” असे ते म्हणाले.
तसेच, काँग्रेसमधील सुरू असलेल्या चर्चा, तर्क-वितर्क आणि अनावश्यक वक्तव्यांना आता पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे उद्याची बैठक कर्नाटकच्या राजकारणासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta