Monday , September 21 2026
Breaking News

१५ नोव्हेंबरला दुष्काळी परिस्थितीचा अहवाल द्या

Spread the love

 

मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना सूचना

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हा पालक मंत्र्यांना राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा दौरा करून १५ नोव्हेंबरला सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील २३६ पैकी २१६ तालुके अपुऱ्या पावसामुळे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्देश जारी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी मंत्र्यांना कार्यक्रम जाहीर करताना सांगितले की, राज्यातील लोक, पशुधन, शेती आणि उद्योगांसाठी पिण्याच्या पाण्याची गरज, चारा, रोजगाराची परिस्थिती, दुष्काळ निवारणाचे वितरण आणि दुष्काळाशी सामना करण्यासाठीच्या विविध उपाययोजनांवर मंत्रिमंडळासह जिल्हाधिकारी व जिल्हापंचायतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
येत्या दोन आठवड्यांत जिल्ह्याचे पालक मंत्री जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेट देऊन पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगार, पिकांचे नुकसान आणि इतर समस्यांबाबत आवश्यक माहिती गोळा करतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोशाळा आणि चारा बँकांच्या स्थितीचा स्थानिक आमदारांसोबत आढावा घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता घेण्याच्या कडक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात. सिद्धरामय्या यांनी मंत्र्यांना दुष्काळी परिस्थिती आणि सरकारने केलेल्या मदतीच्या उपाययोजना संबंधित तालुक्यांच्या प्रसार माध्यमांच्या वार्ताहरांना समजावून सांगून १५ नोव्हेंबर रोजी आपापल्या जिल्ह्यांतील दुष्काळाबाबतचा सविस्तर अहवाल द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *