
सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या
बेळगाव : सणासुदीचे दिवस आले… घरात आनंदाचे वातावरण असायला हवे; मात्र आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांचे लक्ष लागले आहे ते गृहलक्ष्मी योजनेच्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याकडे! योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी शासनाकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. मात्र या प्रक्रियेच्या फेर्यात पात्र महिलांचीच फरपट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेकांच्या खात्यावर हप्ता जमा झालेला नसल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कर्नाटक सरकारची गृहलक्ष्मी योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांसाठी महिन्याच्या घरखर्चाचा महत्त्वाचा आधार ठरली आहे. दोन हजार रुपयांतून किराणा, रेशन, औषधे, मुलांचा खर्च किंवा घरातील अन्य गरजा भागविणाऱ्या कुटुंबांसाठी ही रक्कम अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात हप्ता रखडल्याने महिलांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम झाला आहे.
अपात्रांना रोखणे योग्य; पात्रांना का थांबवता?
योजनेच्या माध्यमातून मृत व्यक्तींच्या नावावर रक्कम जमा होणे, चुकीच्या अथवा बोगस कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणे, अपात्र व्यक्तींच्या खात्यावर निधी जाणे असे प्रकार रोखण्यासाठी शासनाने पडताळणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारी निधीचा अपव्यय रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यकच आहे. मात्र अपात्रांचा शोध घेताना पात्र लाभार्थ्यांचा हक्क आणि त्यांची आर्थिक गरज दुर्लक्षित होऊ नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी अद्ययावत केली आहे. अंगणवाडी सेविकांकडूनही पुढील प्रक्रियेची माहिती दिली जात आहे. त्यामुळे ‘आता तरी दोन हजार रुपये खात्यावर जमा होतील’, या आशेने महिला वारंवार अंगणवाडी केंद्रे, संबंधित कार्यालये आणि बँकांमध्ये चौकशी करताना दिसत आहेत.
दोन हजारांची रक्कम, पण आशा मोठी!
दोन हजार रुपये ही रक्कम शासनाच्या दृष्टीने कदाचित एका लाभार्थ्याचा छोटा आर्थिक हप्ता असेल; मात्र गरीब कुटुंबातील महिलेसाठी हेच दोन हजार महिन्याच्या बजेटचा आधार असतात. सणासुदीच्या काळात किराणा, मुलांचे कपडे, घरातील आवश्यक वस्तू आणि अन्य खर्च वाढलेला असताना गृहलक्ष्मीचा हप्ता मिळणे अनेक कुटुंबांसाठी दिलासा देणारे ठरते.
त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांची पडताळणी करताना ‘अपात्रांना वगळा; पण पात्रांना वंचित ठेवू नका’, अशी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त होत आहे. कागदपत्रांची पूर्तता केलेल्या पात्र महिलांच्या खात्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून त्यांचा प्रलंबित हप्ता जमा करावा, अशी मागणीही होत आहे.
सणासुदीच्या काळात गृहलक्ष्मीचा हप्ता म्हणजे केवळ दोन हजार रुपये नाहीत; तो अनेक घरांतील चुलीचा, किराण्याचा आणि कुटुंबाच्या छोट्या-मोठ्या गरजांचा आधार आहे. त्यामुळे पडताळणीच्या प्रक्रियेला वेग देऊन पात्र महिलांच्या खात्यावर हप्ता तातडीने जमा करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta