खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून आंदोलनाचा इशारा
बेळगाव : सीमाभागात मराठी शाळांबाबत कर्नाटकी प्रशासनाचा दुजाभाव सुरूच असून तालुक्यातील अनेक मराठी शाळांमध्ये मराठी शिक्षकांऐवजी एकमेव कन्नड शिक्षकाची नेमणूक करून जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना कन्नड अभ्यासक्रम देण्याचा अट्टाहास सुरू करण्यात आला आहे. याबाबत मराठी भाषिकांतुन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच तातडीने मराठी शाळेमध्ये मराठी विषयाच्या शिक्षकांची नेमणूक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.
नंदगड गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील आणि पूर्णपणे मराठी बहुल गाव असलेल्या गरबेनहट्टी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मराठी शाळा आहे. या शाळेमध्ये आतापर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे मात्र विविध प्रकारची कारणे देत मराठी शाळा मोडकळीस काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकी प्रशासनाकडून या शाळेत मराठी विद्यार्थी असल्याची माहिती असूनही या शाळेत कन्नड शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्या तरी येथील मराठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइनद्वारे फक्त कन्नड विषयाचा अभ्यासक्रम पाठवून दिला जात आहेत. याबाबत येथील शाळा सुधारणा कमिटी व पालकांनी विचारणा केली असता मराठी शिक्षकांची जागा रिक्त असल्यामुळे फक्त कन्नडमधून अभ्यासक्रम दिला जात आहे, अशी माहिती दिली जात आहे. मात्र शिक्षण खात्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही कन्नडसक्ती करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्यातील अनेक मराठी शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून या शाळांमध्ये शिक्षकांची तातडीने नेमणूक करावी, अशी मागणी सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत एकदाही शिक्षक भरती करण्यात आली नसून दरवर्षी अतिथी शिक्षकांची नेमणूक करून वेळ मारून नेली जात आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम देण्यासाठी शिक्षण खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत मात्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये मराठी विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम द्यावा कोणी असा प्रश्न निर्माण होत असून शिक्षण खात्याने कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून तातडीने मराठी शाळांमध्ये मराठी शिक्षकांची नेमणूक करावी. अन्यथा याबाबत आंदोलन करण्याचा इशारा युवा समितीच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.
प्रतिक्रिया
गरबेनहट्टी गावातील मराठी शाळेत अभ्यासक्रम मराठीच होता मात्र गेल्या दीड वर्षांपासून येथील शिक्षक निवृत्त झाल्यामुळे त्या ठिकाणी नवीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याची माहिती मिळाली. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. – राजू पाटील, पदाधिकारी युवा समिती