

बेळगाव : खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जामगाव परिसराला बसला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठे झाड कोसळून वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, जामगावसह परिसरातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. मात्र, दोन दिवस उलटूनही हेस्कॉम विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी दुरुस्तीसाठी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून मोबाईल चार्जिंगसह दैनंदिन कामकाजही विस्कळीत झाले आहे. अंधारामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
जामगाव परिसरातील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करून तुटलेले वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी हेस्कॉम प्रशासनाकडे केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta