

खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी गावात गटारातील पाणी सोडण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी नंदगड पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मृताची ओळख अमीर हुसेन पाश्चापूर (वय 48) अशी झाली आहे. तर अशोक रामा उगरखोड (वय 28, रा. तोलगी) याच्यावर हल्ल्याचा आरोप असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोघांच्या घरामागील गटारातून पाणी वाहून नेण्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी सकाळी पुन्हा याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
यावेळी आरोपीने संतापाच्या भरात जवळील पिकॅक्स (लोखंडी खोदकामाचे अवजार) उचलून अमीर हुसेन पाश्चापूर यांच्यावर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या अमीर हुसेन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेनंतर तोलगी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नंदगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta